Thursday, June 8, 2023

Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!



 मागील लेखामध्ये आम्ही तुम्हाला वेळणेश्वरसह हेदवी, बामणघळविषयी माहिती दिली होती. तुम्हाला तो लेख नक्कीच आवडलाही असेल. आता आम्ही तुम्हाला कांदळवनांबद्दल सांगणार आहोत. (Konkan kandalvan Safari) त्याचसोबत श्रीवर्धन, हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, अरवी बीच, घुमचे घुमेश्वर मंदिर आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अनेक ठिकाणांविषयी माहिती देणार आहोत. कांदळवनांचं पर्यटन करणारे गाव म्हणून ‘काळिंजे’ प्रसिद्ध आहे. समुद्रालाच आपला देव मानणारे आणि त्याची पूजा करणारे येथील माणसं निसर्गाची राखण कशी करतात, याची अद्भुत सफर घडवणारी कांदळवनांची सफर आयुष्यात एकदा का होईना, करायलाचं हवी. नेहमीपेक्षा थोडीशी हटके असणारे ही ट्रीप तुम्हाला न विसरणारी ठरेल! (Konkan kandalvan Safari)

तांबळडेग, सिंधुदुर्गमध्ये कांदळवने पाहायला मिळतात. मालवणमध्येही, वेंगुर्ल्यातील एका बीचवरही कांदळवन आहे. पण आज आम्ही तुम्हाला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावातील निसर्ग पर्यटनाविषयी सांगणार आहोत. सोबत अरवी, हरिहरेश्वर, आरवी बीचविषयी सांगणार आहोत.

श्रीवर्धन –

श्रीवर्धन हा रायगड जिल्ह्यातील निसर्गाने नटलेले तालुक्याचे ठिकाण आहे. नारळ, पोफळी आणि सुपारीच्या बागांनी वेढलेले श्रीवर्धन तीर्थक्षेत्रामुळेही प्रसिद्ध आहे. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान श्रीवर्धन होय. पेशव्यांचे शहर म्हणूनही श्रीवर्धन’ला ओळखले जाते. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून या ठिकाणांना अवश्य भेट द्यायला हवी.

श्रीवर्धन बीच –

अतिशय स्वच्छ असे श्रीवर्धनचे बीच आहे. एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत अशी श्रीवर्धनची भौगोलिक रचना आहे. लांब पसरलेले रुंद समुद्रकिनारे आणि शांतता हे येथील वैशिष्ट्य म्हणता येईल. येथे घोंगवणारा वारा आणि नीरव शांततेत सूर्यास्त पाहणे म्हणजे ‘व्वा! अप्रतिम’. येथे घोडेस्वारी, बग्गीतून फेरफाटका मारता येतो. तुम्ही जण सहलीचा प्ल्रॅन करत असाला तर श्रीवर्धनला नक्की जा.

कसे जाल?

श्रीवर्धनला रेल्वे आणि बसने जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे. ४५ किमी. प्रवास करून तुम्ही रेल्वेने श्रीवर्धनला पोहोचू शकता. श्रीवर्धन हे अलिबागपासून ११७ किमी. अंतर तर मुंबईपासून १८२, तसेच पुण्यापासून १६२ किमी. अंतर आहे.

काय खाल?

सीफूडची चव चाखण्यासाठी येथे एक रात्र घालवावी लागेल. ताजे मासे, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा, तारली, कोळंबीची टेस्टी टेस्टी चव चाखायला कुणाला आवडणार नाही! त्याचसोबत येथील उकडी मोदक प्रसिद्ध आहेत. (Konkan kandalvan Safari)

कुठे राहाल?

राहण्यासाठी रिसॉर्ट्स, निवासस्थाने, हॉटेल्स उपलब्ध आहेत.

आणखी काय काय पहाल ?

पेशवे स्मारक-पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या जन्मस्थळी पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे.
लक्ष्मी नारायण मंदिर- भगवान विष्णूचे हे मंदिर २०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते.

दिवेआगर बीच-

श्रीवर्धनपासून २३ किमी. अंतरावर हा स्वच्छ बीच आहे.

स्वयंभू घुमेश्वर मंदिर –

घुम गावातील हे स्वयंभू घुमेश्वर मंदिर होय. काही प्राचीन मूर्ती इथे पाहायला मिळतात. श्रीवर्धनपासून अर्धा तासांच्या अंतरावर हे मंदिर आहे.

श्री जिवनेश्वर मंदिर देवस्थान-

श्री जिवनेश्वर मंदिर पेशवेकालीन असून मंदिराचे सुबक बांधकाम आहे. हे मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर आकर्षक आहे.

हरिहरेश्वर –

येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे श्री हरिहरेश्वरचे प्रसिद्ध मंदिर आहे. हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी रिसॉर्टदेखील आहेत. वर्षभर पर्यटनासाठी हे ठिकाण उपलब्ध आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस असतो. तसेच काळभैरवाचे मंदिरही तुम्हाला पाहता येईल.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १ किमी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.

वेळास बीच-

वेळास बीच कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल?

हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी. अंतरावर अंतरावर हे ठिकाण आहे.

आरवी बीच –

श्रीवर्धनजवळील आरवी समुद्रकिनारा हा सुंदर पांढऱ्या वाळूचा किनारा आहे.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १० किमी तर दिवेआगरपासून १२ किमी. अंतरावर हा किनारा आहे. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजननाचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे डॉल्फिनही पाहता येतात.

आरवी बीचजवळ रिसॉर्ट्स आहेत. काही घरगुती निवास व्यवस्था आहे. तसेच या जवळ असणारे आडगाव बीच, शेखाडी बीच, कोंवील बीच, नानवली लाईट हाऊस पाहता येईल.

कांदळवनांची अविस्मरणीय बोट सफर

अनेक समुद्रकिनाऱ्यांची फिरस्ती झाली असेल तर कोकणातील कांदळवनांची अद्भूत सफर करायलाच हवी राव! श्रीवर्धनमधील काळिंजे गावाला कांदळवनांचे अनोखे वैभव लाभले आहे. कोकण किनारपट्टीवरील हे छोटसं गाव आहे. एका बाजूला बेट आणि दुसऱ्या बाजूला कांदळवन असं निसर्गाचं देखणं रुप आपणास पाहायला मिळतं. शिवाय काळिंजे गावातील महिला गाईड म्हणून काम करतात. वनविभागाच्या कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचे उपक्रम येथे राबवले जाते. संवर्धन आणि संरक्षण करून रोजगारासाठी कांदळवनाची सफारी पुढे येतेय.

एकीकडे बेटाच्या स्वरुपात कांदळवन आणि दुसरीकडे बेटावंर नारळ, पोफळी, चिंच, इतर वनस्पती आहेत. गोड्या पाण्याची विहिरी, जुनी घरे पाहायला मिळतात. ११ प्रजातीचे कांदळवन आणि ५ प्रकारचे मँग्रुव्ह येथे सापडतात. मँग्रुव्ह वॉक, सफारी बोट हे गावातील लोकांचे उपजीविकेचं साधन बनले आहे.

तीवर, पिवळी डुंबी अशी झाडे येथे असून ती स्वत:चे रोपटं स्वत: तयार करतात. यास ‘वॉकिंग ट्री’ देखील म्हणतात. काळिंजे खाडीत ८५ पक्षांची प्रजाती आहेत. ब्लॅक कॅट किंग फिशरचे दर्शनही घेता येते. पानमांजराचे हक्काचे घर (उदमांजरे) म्हणजे कांदळवन होय. कांदळवनात खेकड्यांची पैदास चांगली होते. जमिनीची धूप होऊ नये म्हणून कांदळवनाचा उपयोग होतो.

श्रीवर्धनमध्ये आणखी काय पहाल?

श्री भैरवनाथ मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर गुडेघर, श्री बोरेश्वर महादेव मंदिर, काळेश्वरी मंदिर, श्रीवर्धन, घुमेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, गणपती मंदिर, घुमेश्वर नदी (पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण), रानावली नावाचं ठिकाण, मदगड, कुसमेश्वर. (मदगड येथे शिवकालीन किल्ला आहे)

पर्यटनाची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी श्रीवर्धनची सफर कायमची स्मरणात राहणारी ठरेल.

आता कुठं जायचं? मग, आंबोळगडला जा ना!



तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. पण, कधी आंबोळगडाला गेलाय का? तुम्ही म्हणाल, येथे आहे तरी काय? ही पुढील माहिती वाचल्यानंतर येथे जायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग, चला आंबोळगडला!...  



आंबोळगड हे नाव आपल्या फारसं परिचयाचं नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रसिध्द ठिकाण आहे. निखळ खळखळणारा अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा, घेरायशवंतगड, गगनगिरी महाराजांचं मठ, ध्यानकेंद्र, मुसाकाजी बंदर, आंबोळगडचा किल्ला आणि बरंच काही,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही या ठिकाणाजवळचं आहे. आंबोळगडाला लागून असलेला अथांग पसरलेला अरबी सुमद्र पर्यटकांना खुणावतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ यशवंतगडावरून सरळ थेट रस्ता आंबोळगडाला जातो. आंबोळगडापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काजू आणि आंब्याच्या बागा, फणसाची झाडे आणि दुतर्फा झाडांनी नटलेला निसर्ग पाहता येतो.   


आंबोळगडाला जाताना जी गावे लागतात, तिथे तुम्हाला प्रवासात फार वस्ती, वाहने दिसणार नाहीत. येथील गावेही शांत असलेली तुम्हाला दिसतील. गावातील कर्ते पुरुष हे कामानिमित्त बाहेरगावी असलेले दिसतात.


आंबोळगडचा समुद्रकिनारा -


नेहमी आपल्य़ाला समुद्रकिनारी पिवळी, सोनेरी वाळू दिसते. पण, आंबोळगडच्या समुद्रकिनारी पांढरी आणि काळी वाळू पाहायला मिळते. येथे छोट्या-मोठ्या नौका, होड्यादेखील पाहायला मिळतात. मासेमारीसाठी या होड्य़ा वापरल्या जातात. छोटा समुद्रकिनारा लाभला असला तरी, येथील शांतता मनाला समाधान देऊन जाते. नितळ, स्वच्छ पाणी, भिरभिरणारं वारं आणि सुंदर समुद्रकिनारा तुम्हाला मोहात पाडतो. 


यशवंतगड -


कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे गावात श्री किल्ले घेरायशवंत गड नावाचा किल्ला आहे. नाटे गावातून सरळ पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक भक्कम बुरूज आणि त्याच्या कडेने खंदक असलेलं पाहायला मिळतं. दोन भक्कम बुरुंजामघ्ये प्रवेशद्वार लपलेलं दिसतं. गडावर काही अवशेष, कोरडी विहीर आणि कोठारे पाहायला मिळतात. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला वसलेला आहे.


गगनगिरी महाराजांचे आश्रम-


एका बाजूला विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. अगदी नीरव शांतता असणारं हे ठिकाण. परंतु, समुद्राच्या लाटा या परिसरातील शांतता भंग करतात. आंबोळगडाच्या या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाच्या खालील बाजूस समुद्राकडे जाणाऱ्या जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत. समोरचं लक्ष वेधून घेणारा निळाशार समुद्र आहे. 


येथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या गुहा आहे. येथे भाविक, पर्यटकांना जाता येतं. गगनगिरी महाराजांनी येथे तपश्चर्या केल्याचं सांगितले जातं. येथे ध्यानकेंद्र देखील आहे. या आश्रमाच्या जवळचं आंबोळगडाचा किल्ला आहे. 


आंबोळगडचा किल्ला-


आंबोळगडावर पाहण्यासारखं म्हणजे तुटलेली तोफ, तटबंदीचे काही अवशेष आहेत. वाड्याचे काही अवशेषही इथं शिल्लक आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. आणि उत्तर-पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्यात एक चौकोनी विहीर आहे. 


मुसाकाजी बंदर -


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेलं हे मुसाकाजी बंदर होय. स्वच्छ परिसर असलेलं हे बंदर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंतगडाकडून ३ किमी. अंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे. समुद्राचे निळेशार पाणी आणि मऊ वाळू पर्यटकांचे चटकन लक्ष वेधून घेतात. येथे फारशी वर्दळ नसते. बंदरावर छोट्या-छोट्या होड्या निदर्शनास पडतात. 


शिमगोत्सव -


अप्रतिम शिमगोत्सव येथे पाहायला मिळतो. विशिष्ट पध्दतीच्या पगड्या, एकसारखा वेष, पालखी, हातात वाद्ये आणि एका तालात नृत्य हे नाटे आणि शेडभूच्या परिसरात आम्ही अनुभवलेला शिमगोत्सव होता. तसं पाहिलं तर कोकणात प्रादेशिकरित्या विविध संस्कृती, चालीरीती पाहायला मिळतात. येथील शिमगोत्सवाचे स्वरूपही वेगवेगळे असते. 


आणखी काय पाहाल? 


रत्नागिरी जिल्ह्यात कणकादित्य मंदिर (कनकादित्य हे सूर्यमंदिर असल्यामुळे या मंदिरात रथसप्तमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो), महाकाली मंदिर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदिर आणि कातळशिल्पे ही ठिकाणेही पाहता येतील.  


कसे जाल? 


कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड 


कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड  


तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते. दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल...

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...